Classified

नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या तिसरे दुर्गा रूप – माझे अहो आई बाबा ( अर्थात माझे सासरे आणि सासूबाई )

नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या

तिसरे दुर्गा रूप – माझे अहो आई बाबा ( अर्थात माझे सासरे आणि सासूबाई )

“नवा प्रवास आणि साथ ”

लग्न प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवून आणणारा प्रसंग. मग तो प्रेमविवाह असो वा सुनिश्चित कांदेपोहे वाला असो…

सासर… कुणाचं प्रेमळ, कुणाचं खट्याळ, कुणाचं अवखळ तर कुणाचं डोक्याला ताप… आयुष्य बदलवणाऱ्या लग्नानंतर प्रत्येकाला येणारा अनुभव हा वेगळा असतो.

कुणासाठी सासू मैत्रीण असते, कुणासाठी आई तर कुणासाठी अवघड नातं…

माझ लग्न बालवयात झालं असं मला माझी सगळी भावंड ..अगदी माझी मुल पण म्हणतात..गंमत वाटते पण खर आहे.

आज २५ वर्ष मागे वळून पाहिलं की नव्या नात्याची सुरुवात करतानाचे सगळे प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे समोर येतात. ह्यात काही गोड ,काहि कडू, आंबट, तिखट… खारट सगळे सगळे अनुभव आहेत…ते सगळ्यांचेच असतात.,पण त्यातून प्रत्येक गोष्ट मला शिकवत आली हे ही तितकंच खर!

अहमदनगर सारख्या छोट्याश्या गावात , छोट्याशा परिघात माझ बालपण गेलं. लग्न करून पुण्यात आले आणि सगळ विश्वच बदलल.

लग्न करून पुण्यात आल्यवर वारजे सारख्या नव्या आणि शांत भागात आमचं घर. सासरे आणि नवरा दिवसभर कामाच्या व्यापात.घरात मी आणि सासूबाई. पण तेव्हा सासुबाईंशी गप्पा व्हायला लागल्या. त्यामुळे घर कसं आहे, घरतली माणस कशी आहेत, प्रत्येकाच्या आवडी..निवडी…घरातले सणवार ह्या गोष्टी समजत गेल्या.

महिनाभरानंतर गप्पांचे विषय संपत चालले …मग आता काय..पुढे काय…कंटाळा यायचा..मग सासूबाईंच्या बरोबर कॉलनी मध्ये ओळखी तिथे चालणारे उपक्रम हे समजायला लागले. त्यामुळे जरा नवा विरंगुळा मिळाला.

सुट्टीचा दिवस पुण्यातल्या नव्या जागा ना भटकंती..कधीतरी नाटक, सिनेमा अस करत मी घरच्यांबरोबर बाहेर पडायला लागले.

सासरे किंवा नवरा ह्यांच्या गाडीवर मागे बसून माझा प्रवास सुरू होता…आणि एक दिवस सासुसासरे म्हणाले अग कंटाळा आला की तडक निघायचं बस स्टॉप ला जायचं आणि पुण फिरून यायचं…पण हे धाडस कुठून येणार…

पण म्हणतात ना अनुभव माणसाला शहाण बनवतो😃. (अहो )आईंच्या बरोबर ऋषी पंचमीला अथर्वशी्ष म्हण्ययाला म्हणून गेले. प्रचंड गर्दी..आईंच्या मैत्रिणी…आणि मी अथर्वशी्ष नंतर दर्शन घेऊन एका ठिकाणी जमायचं ठरवलं पण गर्दीत माझी सगळ्यांची चुकामूक झाली आणि मी हरवले… हो हरवलेच…काही केल्या कोणी सापडेना…दिसेना…हातात मोबाईल ही नव्हते तेव्हा… पार रडकुंडीला आले…गल्ल्या पार करत कुठेतरी बाहेर पडले …एवढ्या सकाळी एक टेलिफोन बूथ दिसला..आधी घरी फोन लावून बाबांशी बोलले. आणि हरवले आहे हे सांगितला! बाबांनी घरी कसं यायचं सांगितलं..शोधाशोध करत धडपडत…घरी पोचले…एव्हाना सासूबाई पण मला शोधून दमून घरी पोचल्या होत्या…मधल्या काळात माझे सासरे आमच्यातला संदेश वाहक होते😃 पण घरी आल्यावर दोघांनी सांगितल आता तू स्वतः एकटीने बाहेर पडायचं…काही हरवत नाहीस शिकली आहेस ना बोलायचं …सगळ सोप्पा होत…पण त्यावेळी दोघांनी हे मला सांगितलं नसत तर मी घराबाहेर पडून माझा नवा विश्वासाचां प्रवास सुरू करूच शकले नसते.
पण ह्या अनुभवानंतर नोकरी आणि नवीन ठिकाण फिरताना कायम मला दोघांचे शब्द आठवायचे…बोलत जा रस्ता सापडतो…

नोकरी साठी बाहेर पडताना घरात आई आहेत ह्या खात्री वर मी माझ्या मुलांना सोडून बाहेर पडायचे. संध्याकाळी घरी आल्यावर बाबांनी केलेला चहा आणि अर्धा तास मला शांत मिळावा म्हणून लेकाला चक्कर मारायला घेऊन जाणाऱ्या आई..हे कसं बर विसरता येईल.

नोकरी करताना कठीण प्रसंग पण आले…सगळ छान सुरू असताना अचानक काही अडचणींमुळे नोकरी थांबवावी लागणार अशी वेळ आली. उत्तम नोकरी..भरभक्कंम पगार…अनेक वर्ष हातात स्वतःचा पैसा हे सगळ असताना थांबणं कठीण होत…पण इलाज नव्हता..अश्या वेळी …सगळ थांबवलेल…घरात बसून राहण्याची सवय नाही नैराश्य यायला लागल..त्यावेळी बाबांनी पुन्हा एकदा अभ्यास सुरू कर ..म्हणून लकडा लावला आणि मी पुन्हा एकदा माझ्या आवडत्या संगीत विषयाचा अभ्यास सुरू केला.

गाण सुरू ठेवताना..त्याचा अभ्यास …संगीताचे कार्यक्रम ह्यामध्ये वेळ मस्त जायला लागला. Part-time निवेदिका म्हणून आकाशवाणीवर जायला लागले. ह्यावेळी आई बाबा दोघे माझ्या पाठीशी उभे राहिले.

माझ्या आजरपणात आवाजावर परिणाम व्हायला लागला..अश्यावेळी मात्र मी खचत चालले होते..पण छंद म्हणून लिखाण माझ्या मदतीला आल..तेव्हा बाबा माझ्या लेखनाचे समीक्षक होते.

मला असं वाटत की विचारांचं अंतर,आणि नव्या जुन्याचां मेळ म्हणजे सून आणि सासर.
पण शेवटी घर म्हटल की जसे गोड तसे कटू अनुभव ही आले…कधी कधी शाब्दिक खटके ही उडाले…प्रत्येकाचे विचार कधी जुळत नसतातच…मग कधी अशावेळी थोडा अवधी शांतता आणि मग परत आमचं सुरूच….

एक मात्र होत घरात सासू सासरे असताना एक बंधन नक्कीच असत..सगळ्याचा वेळा संभाळण्याची कसरत ही होते पण वेळप्रसंगी ते एक भक्कम आधार असतात.घर …त्या घराचे रीती रिवाज समजावून सांगणारे शिस्तबध्द शिक्षकही होतात. आणि आपल्या हळव्या प्रसंगात आपले मार्गदर्शक ही होतात.

माझे हक्काचे आई बाबा नसले तरी माझे आई बाबा होऊन माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे अहो आई बाबा!

देवी माते ह्या आई बाबांचा साथ मला नेहमी मिळत राहू दे आणि आमचं नातं अधिक दृढ होत जाऊ दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना🙏🏻

सौ आरती अलबूर – सिन्नरकर

संपर्क 7774080393

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}