वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.

“पेडगांवचे शहाणे”
बऱ्याच वेळा आपण “पेडगांवचे शहाणे” किंवा “वेड पांघरून पेडगांवला जाणे”. असे वाक्प्रचार वापरतो, पण असा कधी विचार केला आहे का? की पेडगांवच का? दुसरे कुठले गांव का नाही?

६ जून १६७४ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्यासाठी एकूण साधारण १ कोटी रुपये (त्या काळात होन हे चलन होतं ) खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला? त्याची ही गमतीशीर हकीगत आणि गनिमी काव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण :-

अहमदनगर जिल्ह्यात ‘पेडगांव’ नावाचं एक गांव आहे. तिथे बहादुर खान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. छत्रपती शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली, की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली, की “२००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि ही सर्व लूट लुटून आणेल” (बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे).
कोणास ठाऊक कशी, पण खानला ही बातमी समजली, तेव्हा तो माजोर्डा चेष्टेने हसत म्हणाला, “सिर्फ २००० मराठा मावले ! उनके लिये तो किले के दरवाजे खोल दो. अंदर आते ही खदेड देंगे, काट देंगे.”
तारीख १६ जुलै १६७४, पेडगांवच्या त्या बहादुरगडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे; हे त्यांच्या लक्षात आले. धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तोच लगेच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. अनपेक्षितपणे झालेल्या या प्रतिकाराने सगळे २००० मावळे बिथरले आणि जीव वाचवायला मागे फिरले, पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते. मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जवळ येऊ लागली, तशी त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी  धूम ठोकली. बहादुर खान स्वतः त्यांच्या समाचारास मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली, कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूर खानास चेव आणीत होती. शेवटी मावळे पार पसार झाले. संपूर्ण २०००ची फौज वाचली..

खानाच्या फौजेत एकच जल्लोष झाला. शिवाजीच्या फौजेला हरवून पळायला लावलं हे काही छोटं काम नाहीच. शिवबांची फौज हरली, पळ काढला ! ही जीत औरंगजेबास कळाल्यावर आपल्याला केवढे इनाम मिळेल? ह्या आनंदात बहादूर खान छाती फुगवून घोड्यावरून डौलत डौलत परतत होता. तितक्यात सगळं सैन्य एकदम शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादुगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठ-मोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, “अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?” “कोई नही जहांपनाह. आपकाही हुकुम था, की सबने मिलकर शिवाजी के उन २००० मावलों पर चढाई करनी है “. आता किल्लेदार, सेनापती आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले, कारण काय आक्रित झालं असणार, ह्याचा त्यांना अंदाज आला. आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे, हे ही ध्यानात आलं आणि ज्याची भीती खरी ठरली. एक घोडेस्वार दौडत आला आणि म्हणाला “हुज़ूर ! गज़ब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. आप सब यहाँ २००० मराठो के पीछे दौड़े और वहाँ किलेपर ७००० मराठोने हमला करके सब लूट लेके चले गए हुजूर !”.

अशा प्रकारे राज्याभिषेकाचा खर्च एक कोटी ही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात आणि हे सगळं नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, रक्ताचा एक थेंबही न सांडता. हे सगळं नाट्य घडलं कुठे? तर पेडगांवला. खानला वेडं बनवलं ते त्या पेडगांवात आणि म्हणून पेडगांवचे शहाणे आणि वेड पांघरून पेडगांवला जाणे. हे दोन वाक्प्रचार मराठी भाषेला लाभले.😄

छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.🙏🏻🙏🏻

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}