कथा प्रेमाची गोष्ट लेखिका सुहासिनी कंझारकर

कथा. प्रेमाची गोष्ट
सृष्टी मुंबईकडे धावणाऱ्या बस मध्ये प्रवास करत होती.बस सारखा तिच्या विचारांचा वेग पण खूप वाढला होता. ती खूप कावरी बावरी झाली होती. भेदरली पण होती.
सृष्टी आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी, सुंदर नाही पण सावळी स्मार्ट लांब सडक केस मोहक बांधा. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. आई स्वयंपाकाची काम करायची. वडिलांची दृष्टी थोडी अधू होती. घरची परिस्थिती अगदी सामान्य त्यातूनही आई थोडे थोडे पैसे शिल्लक टाकायची.
सृष्टी 82 सालामध्ये बारावी पास झाली. पुढे शिक्षणासाठी पैसा नव्हता त्यामुळे आई-वडिलांनी तिचे लग्न करायचे ठरवले. सृष्टीला अजिबात लग्न करायचे नव्हते कारण तिने आजूबाजूला नेहमी नवरा बायकोची भांडण, नवरा दारू पिऊन बायकोला मारतो हे सगळं बघितलं होतं. त्यामुळे आयुष्यभर लग्न करायचं नाही आई-वडिलां जवळ राहायचं असे तिने ठरवले होते पण तिच्या आई-वडिलांनी लागलीच तिच्यासाठी एक स्थळ शोधलं. मुलगा आणि घरचे बऱ्यापैकी होते. सृष्टीने आई-वडिलांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला की तिला लग्न नाही करायचे परंतु कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हतं. म्हणूनच कोणालाही न सांगता थोडे पैसे आणि कपडे घेऊन सृष्टी घरातून पळून चालली होती. आपला चेहरा तिने स्कार्फने झाकून घेतला होता जेणेकरून तिला कोणी ओळखू नाही.
कंडक्टरनी घंटी वाजवली तशी सृष्टी आपल्या विचारातून बाहेर आली आणि बसमधून खाली उतरली. काय करावं तिला काही कळत नव्हते. डोंबिवली च्या बाबतीत तिने बरेच ऐकले होते म्हणून विचारपूस करून ती डोंबिवलीच्या बस मध्ये चढली. खाली उतरून एका बाकावर बसली. तिचा चेहरा खूप कावरा बावरा झाला होता अगदी रडकुंडीला आली होती. तेवढ्यात एक वयस्कर गृहस्थ तिच्या जवळ आले. त्यांनी ओळखले की मुलगी कुठल्यातरी विवंचनेत आहे नाडकर्णी त्यांचं नाव. त्यांनी खूप गोड बोलून तिची विचारपूस केली. सृष्टीला आता रडूच कोसळले. त्यांनी तिला धीर दिला. तिच्या आई-वडिलांना व्यतिरिक्त तिने सर्व काही नाडकर्णी काकांना सांगितले.
काकांनी तिला एक शेअरिंग रूम शोधून दिली आणि जवळच एक चहाचा स्टॉल उघडून दिला त्यासाठी लागणारी थोडीफारआर्थिक मदत त्यांनी केली. तिला वाटले नाडकर्णी काका आपल्यासाठी देव म्हणूनच मदतीला आले.
सृष्टी चहा बनवण्यामध्ये अतिशय तरबेज होती उत्कृष्ट चहा बनवायची त्यामुळे थोडे दिवसातच तिच्या स्टॉलवर गर्दी व्हायला लागली. ऑफिसमधले स्त्री-पुरुष, कॉलेजचे विद्यार्थी सगळे तिच्या स्टॉलवर यायचे ती सगळ्यांशी गोड बोलायची पण चेहऱ्याला मात्र स्कार्फ बांधलेला असायचा जेणेकरून तिला कोणी ओळखू नये.
या सगळ्या लोकांमध्ये अजय देशपांडे नावाचा इन्स्पेक्टर तिच्या स्टॉलवर रोज यायचा, चहा घ्यायचा, तिच्याशी संवाद साधायचा. तिचे बोलणे तिचा स्वभाव त्याला खूप आवडायचा. पण एक समस्या होती तिचा चेहरा नेहमी स्कार्फ ने झाकलेला असायचा.
अजय छान उंच धिप्पाड सावळा स्मार्ट होता. तो एकटाच होता आई-वडील भाऊ बहीण कोणीच नव्हते त्याला. स्वभाव अगदी मनमिळावू प्रेमळ होता नोकरीमध्ये इमानदारीने काम करायचा. तो सारखा वाट बघायचा कधीही चा चेहरा आपल्याला पाहायला भेटेल.
असेच दिवस चालले होते. सृष्टीने आता चहा सोबत वडापाव ठेवायला पण सुरुवात केली होती. सुगरणच होती ती त्यामुळे थोडे दिवसातच तिचा वडापाव फेमस झाला. आर्थिक परिस्थिती आता बरीच सुधारली. काकांनी तिला जी पैशाची मदत केली होती ते पण तिने त्यांना परत दिले.
एक दिवस सृष्टीला स्टॉलवर जायला बराच उशीर झाला होता ती घाईतच तयार झाली स्कार्फ पण घाई घाईतच बांधला त्यामुळे तोl व्यवस्थित नव्हता बांधला गेला. दुपारी अजय लंच टाईम मध्ये तिच्या स्टॉलवर चहा प्यायला आला, दोघे गप्पा मारत होते. अचानक वाऱ्याच्या झुळकेने सृष्टीचा स्कार्फ उडून गेला. अजय तिच्याकडे बघतच राहिला त्याला ती खूप आवडली सावळी स्मार्ट तेजस्वी. त्याने तिला लग्नाची मागणी घातली पण सृष्टीने निकराने सांगितले की तिला आयुष्यात कधीच लग्न करायचं नाहीये. हे ऐकून अजय खूप नाराज झाला. तरीपण स्टॉलवर येणे मात्र त्याने सोडले नाही.
दिवस चालले होते . एक दिवस सृष्टीला स्टॉल आवरायला खूप उशीर झाला रात्रीचे साडेअकरा वाजले होते. ती घरी जायला निघाली. रस्त्यावर सामसूम होती. तिला भीती वाटायला लागली. एवढ्यात चार-पाच गुंड तिला आडवे आले आणि तिच्याशी बळजबरी करायचा प्रयत्न करू लागले ती निकराने सुटायचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात अजय एका ठिकाणी मारामारी झाली होती ती केस उरकून तो त्याच रस्त्याने परत चालला होता. सृष्टीला त्याने त्या गुंडांच्या तावडीतून सोडवले त्या गुंडांना चांगलाच मार दिला. ती सगळी घाबरून पळून गेली. सृष्टी धावतच अजयच्या बाहू पाशात शिरली आणि तिच्या मनातील प्रेमाची विण झंकारली, लग्न न करण्याचा विचार कुठच्या कुठे पळून गेला. अजयला त्या गुंडांचा खूप राग आला होता पण एकीकडून त्याने त्यांचे आभार पण मानले. सृष्टीने अजयला आपल्या आई वडिलांविषयी सांगितले आणि गावावरून त्यांना मुंबईला बोलावून घेतले.
एकासू मुहूर्तावर अजयचे आणि सृष्टीचे लग्न पार पडले. माप ओलांडून सृष्टी अजयच्या आणि तिच्या घरात शिरली. कुठून तरी रेडिओवरचे सुर तिच्या कानी पडले “माझ्या मनी प्रियाची मी तार छेडते संसार मांडते मी’

