मंथन (विचार)

*अचूक शब्द*……….. विभावरी कुलकर्णी,पुणे.

*अचूक शब्द*

मला एक लहानपणी ऐकलेली गोष्ट नेहेमी आठवते. एक कोळी असतो. रोज मासेमारी करुन आपला चरितार्थ चालवत असतो.आणि एका झोपडीत रहात असतो. त्याची बायको पण कष्ट करत असते.पण तिचा दैव,भाग्य यावर जरा रोषच असतो. कोळी आहे त्यात समाधानी असतो व मिळेल त्या साठी देवाचे आभार मानत असतो. शक्य तितके परोपकार करत असतो. बरेच दिवस दोघे प्रार्थना करत असतात. एक दिवस प्रार्थना सफल होते आणि एक दैवी शक्ती समोर येते आणि म्हणते तुमच्या तीन इच्छा मी पूर्ण करेन. काय इच्छा आहेत ते सांगा. कोळी म्हणतो आम्हाला भरपूर घरभर मासे पाहिजेत. त्याच क्षणी त्याची इच्छा पूर्ण होते. तो आनंदून जातो. तितक्यात त्याची अविचारी बायको म्हणते “इतके मासे माझ्या नाकाला चिकटवू का” त्याच क्षणी सगळे मासे तिच्या नाकाला चिकटतात. नाईलाजाने ते तिसरी इच्छा मागतात “हे सगळे मासे गायब होऊ दे.” योग्य विचार व योग्य शब्द याचा वापर न केल्या मुळे सगळे वर वाया गेले.

अजून एक गोष्ट लक्षात आहे.आणि ती फार आवडती आहे. एक अंध भिकारी असतो.अनेक वर्षे एका मंदिराच्या बाहेर बसत असतो. त्यालाही एक दैवी शक्ती प्रसन्न होते आणि एकच वर माग असे सांगते. त्याने मागितलेला वर सर्वांनी लक्षात घेण्या सारखा आहे. त्यात त्याची हुशारी व अचूक शब्द दिसतात.जणू ते शब्द म्हणजे आपल्याला शिकवण आहे. त्याचे मागणे असे असते, *माझा खापर पणतू राजाच्या गादीवर बसलेला बघायचा आहे.*
एकाच वरात त्याने किती इच्छा व्यक्त केल्या.असे अचूक शब्द वापरायला शिकले पाहिजे.

प्रत्येक शब्दाला त्याचे *वलय* असते. शब्दातून स्पंदने बाहेर पडतात. आणि तिच आपल्या भोवती असतात. म्हणूनच शब्द योग्य व जपून वापरावेत. शब्दांमध्ये खूप ताकद असते. आपल्या घरातील मोठी माणसे नेहेमी सांगत असतात. शब्द जपून वापरा.सकारात्मक वापरा. समजा आपण ज्या व्यक्ती विषयी अपशब्द वापरतो किंवा राग,चिड व्यक्त करतो ते ऐकायला ती व्यक्ती समोर नसेल किंवा त्या व्यक्तीने ते स्वीकारलेच नाहीत तर काय होईल. भिंतीवर चेंडू टाकल्या सारखे होईल. तो चेंडू भिंतीने न स्वीकारल्या मुळे पुन्हा आपल्यालाच लागेल. तसेच शब्दांचे असते.

म्हणून मंत्रे,स्तोत्रे,जप याला व त्यातील शब्दांना महत्व असते. त्यामुळे सकारात्मक व अचूक शब्दांची निवड महत्वाची असते.

वैश्विक,दैवी शक्ती देत असते.फक्त आपल्याला योग्य शब्दात सांगता यायला हवे. योग्य शब्दांवर फोकस करता यायला हवे. या साठी वैचारिक परिपक्वता,चांगले विचार,परोपकार अशी वृत्ती असायला हवी. तरच आपली योग्य ध्येयाकडे वाटचाल होते.

✒️ विभावरी कुलकर्णी,पुणे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}